” फलटणच्या पुरोगामी चळवळीचा योद्धा काळाच्या पडद्याआड : हरिष काकडे(नाना) यांचे निधन “

दि. 21 सप्टेंबर
फलटण : समाजकारणाचा वसा व विधायक विकासातून राजकारणाचा समर्थ वारसा घेऊन अनेक वंचित, उपेक्षित व दलित बांधवांचे आयुष्य घडवणारे, आपल्या कार्य कर्तृत्वातून मिळालेली अनेक पदे समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करणारे, मग त्यामध्ये जिल्हा एम्प्लॉयमेंट कमिटी असो, नगरसेवक पद असो, जिल्हा खरेदी विक्री संघ, फलटण शेती माल प्रक्रिया संस्था, यशवंत सहकारी बँकेचे संचालक, जिल्हा दक्षता कमिटीचे सदस्यपद इ.असो आपण या सर्व पदांचा वापर तळागाळातील वंचित, शोषित, भटक्या – विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी निःस्वार्थी भावनेने केलात. तुम्ही आमचे आदर्श आहेत.
समतोल वाचनाचा व्यासंग, सामाजिक प्रश्नांची व राजकीय प्रश्नांची उत्तम जाण असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे हरीष काकडे ऊर्फ नाना. नाना यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या विचार व कार्याला भावपूर्ण आदरांजली!

हरिष काकडे ‘नाना’ म्हणूनच त्यांना संबोधले जाते. त्यांचे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण शाळा नं. २ मध्ये झाले. त्यावेळी जंगम, कोळी गुरुजी व ग.दा. काकडे (गणपत दादू काकडे) यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्राथमिक शाळेत त्यांनी कलापथकात ही काम केले. पुढे ते आठवीला मुंबईच्या मराठा मंदिरात दाखल झाले. त्यानंतर इयत्ता ९ वीला ते मुधोजी हायस्कूलमध्ये दाखल झाले. असे करत करत त्यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जयंतीच्या कार्यक्रमामध्ये वयाच्या १२ व्या वर्षापासून आपले विचार प्रकट करत आल्यामुळे चळवळीची ओळख त्यांना लवकरच झाली. त्यांचे वडील ही सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय असल्याने ते याच मुशीत तयार होत गेले. वडिलांचा त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांना वडिलांनी मुक्तपणे वाढू दिले. वडील पडेल ते काम करायचे. आई अत्यंत कष्टाळू होती. ती गवत आणून विकायची. वडिलांना कोणतेही व्यसन नव्हते. आपल्या मुलांचे शिक्षण घ्यावे उच्च पदावर काम करून कला क्रीडा गुणांसह सामाजिक क्षेत्रात योगदान द्यावे द्यावे असे त्यांना मनोमन वाटे. विद्यार्थीदशेपासूनच पी आर काकडे सर त्यांना अभ्यास करायला लावायचे. सामाजिक प्रबोधनाची पुस्तके त्यांना पी आर काकडे वाचायला द्यायचे
         पी आर काकडे, अरुण काकडे, बबन पवार, संभाजी मोरे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत गेले. पी.आर काकडे सरांच्यामुळे नानांना वाचनाची प्रचंड आवड लागली. आज पर्यंत त्यांची आवड त्यांनी जपली होती पी.आर काकडे स्वतः त्यांना शिवाजी वाचनालयात घेऊन जायचे. पुढे ऍड. बी.सी. कांबळे, हरिभाऊ निंबाळकर, आर.आर भोळे, ऍड. जी. बी. माने यांना जयंतीच्या कार्यक्रमाना आणण्यात नानांचा पुढाकार होता. १९७० साली वयाच्या विसाव्या वर्षी ते महात्मा फुले कामगार वसाहतीत राहायला आले. पुढे १९७० साली साहस क्रीडा मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून कला, क्रीडा व समाज प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली. साहस क्रीडा मंडळाचा व्हॉलीबॉल संघ त्या कालावधी मध्ये  प्रसिद्ध होता. त्या संघाने अनेक पुरस्कार मिळवले होते.
त्या संघा मध्ये  दास काकडे, दत्तात्रय गालीअल, मानसिंग भोसले, प्रकाश सोनू अहिवळे असे उत्कृष्ट हॉलीबॉल खेळणारे खेळाडू होते. साहस क्रीडा मंडळाच्या कामात पुढाकार घेतला. या मंडळाच्या स्थापनेत पी.आर. काकडे सरांचे मोठे योगदान लाभले. त्याच प्रमाणे नामदेव बबन अहिवळे, साहेबराव पांडुरंग अहिवळे यांचाही त्यात समावेश होता

नानां नी महात्मा फुले वाचनालयाची स्थापना करून वाचन चळवळ बळकट केली वैचारिक पुस्तकांच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले त्यातूनच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता घडत गेला. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाज कार्यात सहभाग घेतला. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा यामुळेच ते नीतिमान जीवन जगले. समाजात चाललेला मतभेद त्यांना प्रचंड त्रास देत होता. त्यांनी तहयात तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. 1972 च्या दुष्काळात परिस्थिती अतिशय बाकी होती. लोकांना काम धंदा मिळणं मुश्किल झाले होते. उपासमारीची वेळ होती. सरकारने ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हमी योजना सुरू केली. पण शहरी भागासाठी तशी सोय नव्हती. पण फलटणच्या लोकांना जिनिंग कंपनीत मजुरी होती. त्यांना शेतातून कापूस वेचावा लागायचा.पण या मजुरीसाठी मंगळवार पेठेतील बायकांना घेतले जात नव्हते. त्यावेळी नाना युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.मजुरांना 50 पैशात झुणका भाकर मिळायची. या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत नानांनी व्यवस्थापनाशी व तत्कालीन कार्यकर्त्यांची चर्चा करून सर्व महिलांना मजुरी मिळवून दिली. अशा प्रकारे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली.

1974 च्या दंगलीवेळी ऍड. जी. बी माने यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जयंतीचे ते अध्यक्ष होते. यावेळी दोन जयंतीच्या मिरवणुकी निघाल्या. त्याच वेळी गांधीजींचा हात तुटला. याचा फायदा जातीयवाद्यांनी घेतला. अनावधानाने घडलेल्या घटनेला विकृत रूप देण्यात आले.यातून दंगल घडवली. या कठीण प्रसंगी नाना डगमगले नाहीत. ही जयंती काढण्याचा हेतू तात्विक होता. पण याला गालबोट लागले. म्हणून त्यांनी घर जाळली. दुकान जाळली. मारहाण झाली. पण यातून उध्वस्त झालेली घर पुन्हा उभी राहावीत. ही घरे नव्याने उभी करून लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी डॉ. कृष्णाचंद्र भोईटे, वसंतराव नाईक यांच्या मदतीने यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मदत मिळवली. लोकांची झालेली हानी भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वतः केंद्रीय मंत्री होते. त्यांनी तत्कालीन नियोजन राज्यमंत्री श्री.मोहन धारीया यांना माहिती पाठवली. मोहन धारिया यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यांनी या दंगलीची झळ पोचलेल्या बांधवांना अर्थसहाय्य करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस कमिटीने घरे बांधून दिली. स्वतः मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच जातीने यात लक्ष घातले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व मदत केली आणि पुन्हा नव्याने लोकांचे संसार उभे राहिले. नानांनी सर्व गोष्टी स्वतः उभे राहून पाठपुरावा करून पूर्ण करून घेतल्या. त्यांनी व्यापाऱ्यांची मदत घेतली. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कर्ज उपलब्ध करून दिले . लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करण्यासाठी स्वतः यशवंतराव चव्हाण आले होते. यावेळी पहिली सभा मंगळवार पेठेत झाली. यावेळी नानांनी खरी परिस्थिती सर्वांसमोर मांडली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आकाराची पूजा करून विचारांचा मुद्दा काढण्यात आला”
या प्रकरणात दलितांना मोठी किंमत मोजावी लागली. ही किंमत आजही शेवटपर्यंत भरून न निघाल्याची खंत त्यांना वाटत होती. याचाच आधार घेऊन यशवंतरावांनी आपल्या गजानन चौकातील आपल्या भाषणात विचार व्यक्त करताना ते म्हणाले,, “गांधीजींच्या विचारांची पायमल्ली झाली. आकाराची पूजा करून खरोखरच आपण विचारांचा मुद्दा पडला आहे.” नानांनी आपल्या भाषणात म्हटले की, दलितांच्या बद्दल करुणास्पद बोलणे ही पुरोगामी पणाची पद्धत बनली आहे. याचाच आधार घेत नानांनी अनेक कामे मार्गी लावली.

तसा त्यांचा पिंड समाजकार्याचा नव्हता. ते बुजरे, भिडस्त होते. पण पी. आर काकडेंच्या सहवासाने, मार्गदर्शनाने ते समाजकार्याकडे वळले. ते काम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवले. साखरवाडीत पी. आर काकडे तलाठ्यांच्या हाताखाली काम करत असताना ऍड. जी. बी माने वकिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, खाणकामगार झोपडपट्टीतील लोकांसाठी अनेक कामे हाती घेतली त्यांनी वाचनालये सुरू केली.

“सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटना ”
सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटनेत नानांनी उपाध्यक्ष पद भूषवले. या संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने होते. त्यांच्यासोबत ही नानांनी काम केले. विभागीय बैठका घेतल्या. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यासाठी बैठक आयोजित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. नामांतरासाठी निघालेल्या लॉंगमार्चमध्ये ही त्यांचा सहभाग होता. यामध्ये जेष्ठ पत्रकार विजय मांडके, रामनाथ चव्हाण, पार्थ पोकळे, ऍड.जी.बी माने यांच्या बरोबर काम करून वस्तीगृह, शिष्यवृत्ती यासारख्या प्रश्नावर लढा दिला.

  “सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक “
या संघात अनेक वर्षे संचालक, उपाध्यक्ष म्हणून दैदिप्यमान कार्य नानांनी केले. यामध्ये किसनवीर, माजी आमदार लालसिंग शिंदे, माजी आमदार बाबुराव घोरपडे, केशवराव पाटील, लक्ष्मण पाटील हे जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हा खरेदी विक्री संघावर होते. तर मदन पिसाळ हे निवडून आले होते. यांच्यासारख्या लोकांसोबत जवळ जवळ १७ वर्षे या संघात काम केले.

  ” सातारा जिल्हा मागासवर्गीय सुधार महासंघ अध्यक्ष ”
या महासंघाच्या माध्यमातून नानांनी अनेकांना मदत केली. त्यावेळी बॅ. अंतुले यांनी संपूर्ण बॅकलॉक भरण्याचा आदेश दिला होता. यावेळी विदर्भातील कॉंग्रेसचे नेते नाशिकराव तिरपुडे यांनी सेवा योजना कार्यालयाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थाना दिली होती. यात त्यांनी सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नानांची निवड केली. या महासंघाचे कार्याध्यक्ष होते साहेबराव काकडे ते काम पाहत होते. या महासंघाचे ऑफिस महालक्ष्मी बेकरी, जनता लॉड्री येथे होते. या महासंघाच्या स्थापनेचा उद्देश चांगला होता. सेवायोजना कार्यालयाचीच जबाबदारी या महासंघाकडे देण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थानी पात्र उमेदवारांची यादी करून संबंधित विभागाकडे पाठवायची होती. यामुळे मंगळवार पेठेतील ९ उमेदवारांना तलाठी पदासाठी नानांनी शिफारस केल्याने त्यांची तलाठी म्हणून निवड झाली. त्यांनी अनेक खात्यातील वनरक्षक, महसूल, पाठबंधारे या खात्यांसह अनेक खात्यातील पात्र उमेदवारांना नानांनी संधी दिली.

”  महात्मा फुले विचार प्रसारक मंडळ १९७१ साली कार्यरत  “
सामाजिक समतेचा प्रचार होऊन बहुजन समाज समताधिष्टीत बनावा यासाठी ऍड. जी.बी माने, बबनराव अडसूळ, बबनराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये फलटणमधील समतावादी विचाराने कार्य करणारे कार्यकर्ते होते. यात विलासराव बोरावके, पी.आर काकडे, सुभाष निंबाळकर, बनकर, लोणकरसर, इतिराज, एल. एस अहिवळे, कीर्तीकुमार काकडे यांचा समावेश होता. यामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या विचार प्रसारक मंडळाच्या माध्यामतून महात्मा फुल्यांची जयंती कार्यक्रम आयोजित केला. यासाठी प्रसिद्ध विचारवंत ग. बा सरदार व शंकरराव खरात आले होते. कार्यक्रम राजवाड्यातील मुदपाकखाना सध्याची जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत आहे त्या जागेवरील मैदानात झाला. समोर मोठमोठे दिग्गज लोक ऐकण्यासाठी बसले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतः नानांनी केले. त्यामुळे त्यांची स्रोत्यावर वेगळीच छाप पडली.

  ” पुणे आकाशवाणी केंद्रावर युवा वाणी सदरात विचार मांडण्याची संधी “
या वेळी ऍड. जी. बी माने वकिलांचे मित्र आकशवाणी पुणे चे संचालक बी. बी भोसले सहकारी जाधव यांच्यावर तर खूपच प्रभाव पडला. म्हणून त्यांनी आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणाऱ्या युवा वाणी या सदराखाली ‘मला काय वाटते’ या शीर्षकाखाली सुरु असणाऱ्या कार्यक्रमात नानांना संधी दिली. यामध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर ८ मिनिटे नानांनी आपले विचार व्यक्त केले. पी. आर काकडे सरांनी हे भाषण प्रसारित झाल्याची बातमी सांगितली. या महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात नानांचा सिहांचा वाटा होता. व्याख्यानमालेसह निबंध, वक्तृव, रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही अनेक वेळा केले गेले.
              ” दैनिक मराठा मध्ये लेखन “
तो काळ होता चळवळीचा, शिक्षणाचा प्रसार होत होता. नुकतीच शिकलेली पिढी तयार होत होती. सामाजिक समतेसाठी अनेक चळवळी सुरु होत होत्या. लोक जागृत होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागले होते. जातीयता अजून ही पूर्वीसारखी जागृत होतीच. ती आपले वेळोवेळी उग्र रूप दाखवतच होती. अशीच घटना घडली. जातीयवाद्यांनी गवई बंधूंचे डोळे काढले. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी पी. आर. काकडे सरांनी नानांना लेख लिहिण्यास सुचवले. दैनिक मराठा मध्ये नानांनी लेख लिहिला. यावर स्वतः प्राचार्य विलायत शेख यांनी नानांना भेटून लेखा बद्दल कौतुक केले व कामाची स्तुती केली. ते म्हणाले, “माझ्या अगोदर तुमचा लेख छापून आला” अशा प्रकारे लेखनास नानांची सुरवात झाली. १९७४ साली नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. कॉंग्रेसच्या वतीने बाबासाहेब मोरे निवडणुकीला उभे होते. त्यांना चिमणराव कदम हरिभाऊ निंबाळकर यांची मदत होती. स.रा भोसले निवडून आले. त्यावेळी कृष्णचंद्र भोईटे बाबासाहेब मोरे यांचे बरोबर होते. पण अंतर्गत कलहामुळे, गटबाजीमुळे बाबासाहेब मोरेंचा पराभव झाला. नानांनी नेहमी समतावादी विचारांची कास धरली. जिथे समानतेची वागणूक मिळेल त्यांच्या समवेत ते कायम राहिले. माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्याशी त्यांचे शेवटपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध राहिले. आज डॉ. कृष्णचंद्र भोईटे नाहीत पण त्यांचा स्नेह मात्र नानांनी आयुष्यभर जपला.
                           ” नगरसेवक ”
२००१ ते २००६ या कालावधीत नानांनी नगरसेवक म्हणून कार्य केले. त्या काळात त्यांनी महात्मा फुले कामगार वसाहतीत २ समाज मंदिरे उभारली. सांडपाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते अशी विविध कामे केली. आज कामगार वसाहतीत असणारे बुध्द विहार त्यांच्याच प्रेरणेमुळे उभे राहिले.

नानांनी विविध पदावर काम केले. त्यांनी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना फलटणमध्ये आणून कॉ. हरिभाऊ निंबाळकरांच्या हस्ते मानपत्र दिले. त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रैली काढली. म्युनिसिपल कामगारांच्या न्यायी हक्कांसाठी प्रयत्न केले. यशवंत सहकारी बँकेत ते स्थापनेपासून संचालक आहेत. सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर ही त्यांनी प्रभावी काम केले आहे. आणीबाणीच्या काळात वीस कलमी कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या जमीन वाटप समितीवरही ते होते अशा प्रकारे मिळालेल्या विविध पदांचा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कधीच वापर केला नाही समाजाच्या हिताचा कायम त्यांनी विचार केला. आज त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून डोळ्याच्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या. फुले,शाहू, आंबेडकर चळवळीतील एक एक पान गळून पडू लागले असल्याची जाणीव होऊन मन अस्वस्थ झाले. नव्या पिढीमध्ये असं नेतृत्व उदयाला येताना दिसत नसल्याची खंत माझ्या आजही मनात आहे. येणाऱ्या काळामध्ये असे नेतृत्व तयार झाले तरच शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ पुढे जाणार आहे.

आदरणीय हरिष काकडे अर्थात आपल्या सर्वांचे नाना यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी नानांचे कार्य निश्चित दिशादर्शक ठरेल यात कोणतीही शंका नाही. नानांच्या रूपाने पुरोगामी विचारांचा खंदा योद्धा आज हरपला आहे. आंबेडकरी समाजाची ही खूप मोठी हानी झाली आहे. नानांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या कार्याची आठवण प्रत्येक क्षणाक्षणाला येत राहील. कालकथित हरिष काकडे(नाना) तुमच्या विचार कार्याला भावपूर्ण आदरांजली!!!

आयु. सोमनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता, सासकल
ता. फलटण जि. सातारा
मोबाईल नंबर : 92 84 65 86 90

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!