डॉ.बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचे प्रणेते होते. :      प्रा. डॉ. प्रभाकर पवार                                                


हजारो वर्षे विषमता,अज्ञान, अंधश्रद्धा,गुलामी व पुरुष सत्ताक व्यवस्थेत खितपत पडलेल्या तमाम स्त्रीजगताला संविधान निर्मिती व हिंदू कोड बिलाद्वारे मुक्त करून तिचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचे प्रणेते ठरतात,असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रभाकर पवार यांनी मुधोजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाने आयोजित केलेल्या “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”, कार्यक्रमातील विशेष व्याख्यानात केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो.प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम होते,तर प्रमुख उपस्थितीत उप प्राचार्या प्रा. सौ. उर्मिला भोसले व प्रा.सौ.नीलम देशमुख होत्या.”स्त्रीमुक्तीचे प्रणेते :डॉ.बाबासाहेब आंबेडकर”, या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ. . प्रभाकर पवार म्हणाले,शिक्षण, ज्ञान,सामाजिक,आर्थिक व राजकीय अस्तित्व नसलेल्या स्त्रीवर्गाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क व अधिकार मिळावा म्हणून डॉ. आंबेडकरांनी संविधान,हिंदू कोड बिल व स्त्री विषयक कायदे निर्मिती मधून मतदानाचा, सर्वोच्च पदाचा घटस्फोट,वारसाहक्क व स्वतंत्र व्यक्तिमत्व विकासाचा मूलभूत  हक्क व अधिकार बहाल केला. कौटुंबिक व सामाजिक स्तर उंचावून तिला मानसन्मान मिळाला.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या लोकशाहीयुक्त मानव मूलभूत तत्त्वात कायद्याद्वारे बांधून स्त्री वर्गाच्या सर्व प्रकारच्या गुलामीच्या बेड्या तोडल्या.हे डॉ. आंबेडकरांचे महान कार्य स्त्री वर्गाला देश व जागतिक स्तरावर माणूस म्हणून चेहरा प्राप्त करून देणारे असून स्त्रीच्या कर्तुत्वाला वाव देऊन देशाच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावणारे क्रांतिकारी पाऊल होते.त्यामुळे स्त्रिया आज सर्व क्षेत्रात मागे न राहता पुरुषांबरोबर प्रगती व विकास करताना आढळतात.आजच्या वर्तमान काळात सर्वत्र आरपार जग बदलत असताना युवतींनी व स्त्री वर्गाने डॉक्टर आंबेडकरांच्या या महान मानव मुक्तीच्या कार्याचा आदर्श ठेवून कुटुंबाबरोबर स्वतःची व भावी पिढ्यांची प्रगती साधली पाहिजे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रो. प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम म्हणाले,सामाजिक विषमता व स्त्री-पुरुष भेदभाव आणि जातीय तेढ या भावना भारतीय समाज मनात खोलवर रुतलेल्या होत्या.शिक्षण,ज्ञान व मानपानापासून वंचित ठेवलेल्या स्त्री वर्गाला डॉ. आंबेडकरांनी उभारलेल्या लढ्यामुळे जगभर मान्यता मिळाली.त्यांनी समतावादी आदर्श समाज रचनेचा आग्रह धरलेल्या कृती आंदोलनांचा स्त्री वर्गाने सन्मान करून सावध व ज्ञानी बनून वाटचाल केली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ नीलम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला कनिष्ठ विभागातील प्राध्यापक- प्राध्यापिका यांच्यासह बहुसंख्य बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संग्राम निंबाळकर यांनी केले व शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!