निर्भीड,निडर,अभ्यासू,धाडसी समाजाभिमुख पत्रकार : प्रा. विकास शिंदे…..

फलटण : दि. 14 मार्च 2026
लेखक, कवी, प्राध्यापक, पत्रकार समाजसेवक, भारतीय पत्रकार संघ : सातारा जिल्हा उपाध्यक्ष अशी अनेक ओळखी आपल्या कार्यातून घडवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. विकास शिंदे सर. फलटण तालुक्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. इतकेच नव्हे तर फलटणच्या परिसरात “लोकमत म्हणजे विकास शिंदे आणि विकास शिंदे म्हणजे लोकमत” असे समीकरणच निर्माण झाले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान करण्याचा हा विशेष क्षण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज,राजमाता अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले,महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ.ऐ.पीजे अब्दुल कलाम, सर्व महामानव यांच्या समतावादी विचारधारेचा वारसा जपत समाजाभिमुख पत्रकारिता करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. विकास शिंदे. त्यांच्या नावामागे पत्रकारितेतील अनेक वर्षांची साधना, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि शब्दांच्या माध्यमातून उभी केलेली विचार क्रांती दडलेली आहे.
प्रा विकास शिंदे यानी गेली पंधरा वर्षे पत्रकारितेत विविध नियतकालिकांसाठी व दैनिकांसाठी लेखन केले साप्ताहिक लोकजगर , साप्ताहिक विचार संगम, फलटण अंजन , दैनिक शिवसंदेश ,दैनिक स्थैर्य ,एकतादर्शन यासाठी लेखन केले शिवसंदेशकार कॉ हरिभाऊ निंबाळकर यांनी बालवयातच प्रा विकास शिंदे यांना शिवसंदेश चे व्यासपीठ खुले केले होते प्रा विकास शिंदे यांना जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ , स्व दिलीप रुद्रभटे, स्व प्रा रमेश आढाव , दिलीपसिंह भोसले , बबनराव क्षिरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले मागील तीन वर्षांपासून ते लोकमत फलटणचे प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत त्यांच्या बदल घडवणाऱ्या बातम्या नेहमीच समाजाभिमुख राहिल्या आहेत
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून ती एक अविरत लढाई असते सत्ता, समाज आणि संस्कृती यांच्याशी समांतर चालणारी आणि सत्यासाठी झगडणारी. ही लढाई त्यांनी निर्भीडपणे लढत समाजासमोर सत्य मांडण्याचे कार्य सातत्याने केले. ते केवळ बातम्या देणारे पत्रकार नाहीत, तर त्या बातम्यांमागील वास्तवाचे भान देणारे सजग लेखक, विचारवंत आणि संवेदनशील कवी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
आजच्या धावपळीच्या “ब्रेकिंग न्यूज”च्या युगातही त्यांनी समजून घेणाऱ्या आणि सत्याचा शोध घेणाऱ्या पत्रकारितेचा मार्ग निवडला. त्यांच्या लेखणीत धार आहे; परंतु त्या धारेला प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेची जोड असल्यामुळे ती नेहमी समाजहितासाठीच वापरली गेली. अनेक सामाजिक, राजकीय घडामोडी, निवडणुका, आंदोलनं आणि बदलत्या सत्तासमीकरणांचा त्यांनी पत्रकाराच्या सजग नजरेतून अभ्यास केला आणि लोकांपर्यंत पोहोचवले.
याचबरोबर सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नातं जपणं ही त्यांची पत्रकारितेची खरी ताकद आहे. समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडताना त्यांची लेखणी अधिक तीव्र आणि प्रभावी होते. भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पत्रकारांना दिशा देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पत्रकारितेचा त्यांचा प्रवास हा केवळ लेखनाचा किंवा बातम्यांचा नाही, तर विश्वासाचा, प्रश्नांचा आणि सत्याच्या शोधाचा प्रवास आहे.
कधीकधी शब्द थांबतात; पण विचारांची वाटचाल सुरूच राहते. अशाच विचारांना दिशा देणारे, शब्दांना बळ देणारे आमचे मार्गदर्शक मित्र प्रा. विकास शिंदे सर हे आमच्यासाठी केवळ पत्रकार नसून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या निर्भीड लेखणीची ऊर्जा, समाजाच्या बाजूने उभी राहण्याची भूमिका आणि सातत्याने केलेले जनहिताचे कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
लेखक, कवी, विचारवंत,समीक्षक समाजसेवक , प्राध्यापक आणि निर्भीड समाजाभिमुख पत्रकार व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलखुलास,सतत हसतमुख असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रा. विकास शिंदे सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!



