क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त निबंध लेखन स्पर्धा

फलटण : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त शहरात सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची लगबग सुरू झाली असून, क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती, फलटण यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि विचारप्रबोधन घडवून आणण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावर आधारित ठेवण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून लेखनातून मांडणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या विचारांची जाणीव निर्माण व्हावी समाज प्रबोधनाचे कार्य पुढे जावे आणि नव्या पिढीने सामाजिक बांधिलकी जपावी हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले
स्पर्धा रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी दहा वाजता संत सावतामाळी महाराज मंदिर नाना पाटील चौक फलटण येथे पार पडणार आहे स्पर्धेचा निकाल 9 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल.
स्पर्धा चार गटांमध्ये विभागण्यात आली आहे. इयत्ता चौथी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पंधरावी आणि खुला गट अशा विविध स्तरांवर विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच पुस्तक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
स्पर्धेसाठी लागणारे लेखन कागद आयोजकांकडूनच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त वेळेत उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून सहभाग पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या ऑनलाइन लिंकवर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. 31 मार्च 2026 ही नावनोंदणीची अंतिम मुदत असून, नोंदणीशिवाय स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सदर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://forms.gle/UGhnK6JHLXBR5a7Z9 या लिंक वरती नोंद करणे गरजेचे आहे.



